कोरेगाव – सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जात असे. मात्र, आपण गेली दोन दिवस जिल्ह्यात फिरत असताना माहिती घेतली असता आता हा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा गड झाल्याचे जाणवले, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघ दौऱ्यानिमित्त सातारारोड (ता. कोरेगाव) येथील यशोदीप मंगल कार्यालयात आयोजित लाभार्थी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश भाजपचे सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, भीमराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद माजी सदस्य किरण बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, नियोजन समितीचे माजी सदस्य राहुल बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, निलेश नलवडे, निलेश यादव, बबनराव कांबळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये भाजप- शिवसेना युतीला जनतेने बहुमत देऊनही ज्यांना पाठीमागून वार करण्याची सातत्याने सवय लागली आहे अशा नेत्यांनी मात्र गेल्या निवडणुकीनंतर अभद्र युती करून शिवसेनेला कॉंग्रेसबरोबर युती करण्यास भाग पाडले.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कॉंग्रेसबरोबर युती करू दिली असती का, असा सवाल करून श्री. मिश्रा म्हणाले, “म्हणूनच आमदार महेश शिंदेंसारख्या आमदारांनी पाठीमध्ये वार करणाऱ्यांना धडा शिकवत भाजपबरोबर युती करून नवीन सरकार अस्तित्वात आणल्याने आज महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करू लागला आहे.’ आमदार महेश शिंदे म्हणाले, “सातारा लोकसभा मतदार संघ 2024 मधील निवडणुकीमध्ये ताब्यात घ्यायचा असेल तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे आपल्याला काम करावे लागेल. भाजपचे संघटन मजबूत आहे तरीही मेहनत घ्यावी लागेल.
जिल्ह्याचे पालकमंत्री आज आपल्याबरोबर आहेत. असे असताना जिल्ह्यातील दोन ते तीन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्यास लोकसभेत यश निश्चित मिळेल. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत भाजप व शिंदे गट जो उमेदवार देईल त्याला आम्ही आमच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य निश्चितपणे देऊ.” भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी प्रास्ताविकात नरेंद्र मोदी सरकारने लोकाभिमुख कार्य केल्यामुळे आणि विविध लोककल्याणकारी योजना राबवल्याने सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला.