सातारा – जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने (आयसीडीएस) राष्ट्रीय पोषण अभियानात सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. या विभागाने राज्यात उल्लेखनीय काम केले असून सातारा जिल्हा या अभियानात राज्यात पहिला आला आहे.
विभागाच्यावतीने गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके आदींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिला, मुली, बालके यांना सकस आहार मिळावा यासाठी काम होते. राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत दि. 1 ते 30 सप्टेंबर या दरम्यान या विभागाने पोषण आहाराचे महत्व पटवून देण्याबाबत अनेक प्रात्यक्षिके घेतली.
अंगणवाड्यांच्या परिसरात परसबागा तयार करणे, गृहभेटी देऊन गर्भवती महिलांना मार्गदर्शन करणे, लसीकरणाबाबत जनजागृती करणे आदी उपक्रम राबवण्यात आले. राज्यात सर्वाधिक उपक्रम रावबल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आयसीडीएस विभागाचा राज्यात डंका वाजला आहे.
हे अभियान यशस्वीपणे राबवून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल महिला व बालविकास समितीच्या सभापती सौ. सोनाली पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी अभिनंदन केले आहे