वाई (प्रतिनिधी) : करोना विषाणूंच्या अनुषंगाने आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाई प्रांत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. वाई तालुक्यातील करोना विषाणूचा फ़ैलाव होऊ नये, म्हणून संचारबंदीने या रोगावर मात करण्यासाठी शहरासह वाई तालुक्यातील गावागावांमधील किरकोळ अपवाद वगळता पोलीस, महसूल या प्रशासनाच्या अधिपत्याखाली नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यावर सोपवली आहे. त्याचे वितरण व नियोजन कशा पद्धतीने चालू आहे, त्यात काही उणिवा व अडचणी आहेत का, याची माहिती घेण्यासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विभागाचे आमदार मकरंद पाटील यांनी नियोजनाची माहिती घेतली.
त्यावेळी आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘तिन्ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका,अंगणवाडी सेविका, आशाताई असे सर्वजण रुग्णांची व मुंबई, पुणे व परदेशातून गावी आलेल्यांची संख्या जवळपास दहा हजारपर्यन्त आहे, अशाची तपासणी करण्यासाठी सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर यांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.’
तिन्ही तालुक्यातील जनतेने प्रशासनाला या आपत्कालीन परिस्थितिचा सामना करण्यासाठी सहकार्य करून स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अजून १५ दिवस लोकांनी करोना विषाणूचा सामना करण्यासाठी कोणीही घरातून बाहेर न पडता सहकार्याची भूमिका घेतल्यास आपण या करोनावर शंभर टक्के विजय मिळवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
तिन्ही तालुक्यामधील गावांमध्ये मुबंई, पुणे व परदेशातून आलेल्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा विहिरी, धरण, नदी, कालवे, तलाव अशा ठिकाणी मौजमजा करण्यासाठी अथवा पोहण्याकरता जाऊन या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होईल असे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी केले. असे वर्तन करताना लोक आढळल्यास तसेच जे नागरिक उगीचच रस्त्यावर फिरताना व आदेशाला कोळून पिणाऱ्या लोकांना फटके देवून पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेणार आहे, याची गैरवर्तन करणाऱ्या संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आमदार पाटील यांनी सूचित केले.