भुईज – गत आठवडाभरापासून वाई तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने ऊस, हळद, सोयाबीन, कांदा, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
वाई तालुक्यातील शेतकरी हे ऊस, सोयाबीन, हळद, कांदा, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेत असतात. यंदा वेळेवर मान्सूनने सुरुवात केल्याने पिकेही चांगली आली आहेत. मात्र सध्या काढणीचे कामे सुरु असतानाच पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे.
तालुक्यातील बावधन, कडेगाव, आसले, भुईज, पाचवड, चिंधवली, उडतरे, विरमाडे भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊसाचे पीक भुईसपाट झाले आहे. सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. पावसाने झोडपल्याने तालुक्यातील इतर भागातही शेतीमालाचे नुकसान झाले आहे.
धोम कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये बागायती पीके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यासाठी मोठा खर्च येतो. पावसामुळे पिकासाठी केलेला खर्च आणि हाताशी आलेली पिके वाया गेली आहेत. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
करोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी वर्ग पावसाने नुकसान होत असल्याने संकटात सापडला आहे. पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करावेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना द्याव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.