– प्रशांत जाधव
सातारा – करोनाच्या अनुषंगाने बंदोबस्तात व्यग्र असलेल्या पोलिसांचे काम चांगले असले, तरी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या मूळ कर्तव्याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. दहिवडी उपविभागात गेल्या चार महिन्यांमध्ये झालेले चार खून, पानवण येथील अपहरण प्रकरण, नरबळी, तलाठ्याला झालेली मारहाण अशा प्रकारांमध्ये संशयितांवर कठोर कारवाई न झाल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे उपविभागात कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने गुन्हे वाढत असल्याचे बोलले जात आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवड येथील खून प्रकरणातील रक्ताचे डाग पुसण्याअगोदरच वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हासुर्णे येथे खुनाची घटना घडली. पानवण येथे अपहरण आणि दहिवडी परिसरात नरबळीचे प्रकरण घडले. दहिवडी उपविभागांतर्गत पडळ, ता. खटाव येथील एका कारखान्याच्या अधिकाऱ्याचा खून झाला.
या घटनांमुळे उडालेली राळ खाली बसते न बसते, तोच दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरवणे (ता. माण) या गावात वाळूच्या लिलावावरून दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात झालेल्या मारामारीत दोघांचे मुडदे पडले. पानवण येथील अपहरण आणि पडळ येथील खून या प्रकरणांच्या मुळाशी पोलिसांना अजून जाता आलेले नाही. त्यामुळे दहिवडी उपविभागात पोलिसांचा “कंट्रोल’ आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपविभागात गुन्हेगारी फोफावण्यास काही पोलिसांना जडलेली खाबुगिरीची सवय कारणीभूत असल्याचे आता पोलीस दलातूनच बोलले जात आहे. दिवड, ता. माण येथे जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पोलिसांच्या “इतर’ या परवलीच्या शब्दाची किंमत जवळपास तीस लाखांवर गेली अन् काही जण नामानिराळे राहिले.
काही जणांना खुली सूट देण्यात आली. त्यामुळे आपण काही केले, तरी पैशांच्या जोरावर आपले कोणी काहीही करू शकत नाही, असा गुन्हेगारी जगतातील लोकांचा समज झाला आहे. परिणामी नरवणे येथे दिवसाढवळ्या दोघांचे खून झाले. या घटना गॅंगवॉरच्या नसल्या, तरी “दिल्या घेतल्या वचनांची…’ असेच सुरू राहिले तर गुन्हेगारांच्या टोळ्या तयार व्हायला वेळ लागणार नाही.
एखादा वाळू व्यावसायिक तलाठ्याची गचांडी धरतो आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील, तर काय उपयोग? हे कमी म्हणून की काय, त्याच घटनेत पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील एका “भानगडबाजा’ने हात साफ करून घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतरही डॉ. देशमुख हे शस्त्रक्रिया करण्याऐवजी केवळ मलमपट्टी करणार असतील, तर आणखी काही विपरित घडू शकते.
बाकी किरकोळ घटना लोकांच्या सवयीच्या झाल्याने त्यांचा भरवसा पोलिसांपेक्षा जास्त नशिबावर आहे. वाळूचा उपसा व वाहतूक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. अशा प्रकरणात वाळूचोरानांच पाठीशी घातले जात असल्याचे वास्तव आहे.
(क्रमश:)
प्रत्येकाला वाटतंय मला काय त्याचे?
एखादी घटना घडल्यावर पोलीस अधिकाऱ्यांची जी भूमिका असायला पाहिजे, ती दिसत नाही. घटना घडली की, ती संधी मानून कामाची रूपरेषा आखण्यात येते. ही प्रवृत्ती “खाल’पासून “वर’पर्यंत फोफावत आहे. काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना “काही किलोमीटर’ पळाल्याशिवाय वरिष्ठ अधिकारी जवळ उभे करत नसल्याची चर्चा पोलीस दलात आहे.