सातारा – मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने रविवारी थैमान घातल्यानंतर साताऱ्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासन सोमवारी दिवसभर करित होता. तालुकानिहाय संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर मदतीचे आदेश निघणार आहेत.
रविवारी सातारा, वाई, खटावसह तालुक्यामध्ये वीजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: सातारा शहर आणि परिसरात झाडे, विद्युत पोल कोसळले होते. तर शाळेच्या संरक्षक भिंती ढासळल्या होत्या.
त्याचबरोबर पोलीस वसाहतीसह इतर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावर रायगाव नजिक सेवा रस्त्यावर वाहने पाण्याखाली गेली होती. यासह जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठ्यांनी सोमवारी केले असून ती प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.