सातारा – पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शनिवारी चक्का जाम आंदोलन केले. पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सरकार करणार की नाही, असा प्रश्न भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णा पाटील यांनी केला.
सौ. पाटील म्हणाल्या, पूजा चव्हाणच्या मृत्यूला 20 दिवस उलटूनही पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला नाही. पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशीही केली नाही. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे.
महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणाऱ्या सरकारच्या काळात एका तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण इतक्या असंवेदनशील पद्धतीने हाताळले जात असल्याची खंत वाटते.
या प्रकरणी बाहेर आलेल्या सर्व पुराव्यांमधून या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचे दिसून येते; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना अभय दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा तातडीने घ्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्मिता निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहराध्यक्ष विकास गोसावी, गणेश पालके, शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, निर्मला पाटील, हेमा भणगे, उत्तम गिरमे, जयदीप ठुसे उपस्थित होते.