सातारा : शहरातील रविवार पेठेतील भाजी मंडई सुव्यवस्थापित करण्याकरिता सातारा नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अन्य सुविधा देण्याचे मान्य केले आहे. तसेच शेतकरी व व्यापारी यांच्यातील संघर्ष समन्वयाने सोडवत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने या वादावर पडदा टाकला आहे. या मंडळींच्या सुरक्षिततेसाठी सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच मंडईच्या द्वाराजवळील हातगाड्यांची अतिक्रमणे काढण्याचे स्पष्ट निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रविवार पेठ भाजी मंडईमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये मालाच्या विक्रीसाठी कोणत्या जागेवर बसायचे या मुद्द्यावरून सातत्याने वादावादी होत असते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा दोन दिवसांपूर्वी वापरण्यात आली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी रोहित नाईक याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला होता.
हा प्रश्न सोडवण्याकरता सातारा पालिका व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने येथील शिवतेज हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, मुख्याधिकारी अभिजित बापट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मंडईच्या डाव्या बाजूला शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दोन ओळी आहेत तेथेच शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करावी, तेथे भिंतीलगत व्यापाऱ्यांनी कोणतेही अतिक्रमण करू नये, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत पालिका प्रशासनाने दिले. यासंदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना राजेंद्र मस्के यांनी दिल्या.
मंडईतील सुविधांबाबतही चर्चा
या बैठकीच्या निमित्ताने मंडईमध्ये असणाऱ्या सुविधांची यावेळी चर्चा झाली. मंडईला उपलब्ध असलेल्या स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था नीट होत नसल्याची तक्रार झाली. तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा देण्याचे निर्देश देण्यात आले.
परिसरातील अतिक्रमणे हटवणे, मंडई परिसरांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून जमीन समतल करणे, सुरक्षितेच्या दृष्टीने सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, भाजीपाल्याचा कचरा टाकण्याच्या दृष्टीने गार्बेज डस्टबिन ठेवणे इत्यादी सुविधा मंडईला दिला जाणार आहेत. मंडईत व्यापारी व शेतकऱ्यांनी समन्वयाने काम करावे, सर्वांनी मंडईच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.