सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पक्षाचे मजबुतीकरण आणि सक्षमीकरण डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. त्यामुळे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचालींनी गती घेतली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना नवीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
भाजपमध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदासाठीची भाकरी फिरवली जाणार असून त्याबाबतची आढावा बैठक प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे नुकतीच झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार मदन भोसले, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.
पक्षाने अंतर्गत मंडल व सक्रिय सदस्य नोंदणीचा आढावा नुकताच पूर्ण केला. या प्रक्रियेची माहिती या बैठकीत घेण्यात आली. नवीन कार्यकर्त्यांना संधी आणि पक्षाचा विस्तार या दृष्टीने प्रदेश कार्यकारणीचा अहवाल सादर होऊन 22 एप्रिलनंतर नवीन मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी केल्या जाणार आहेत.
जिल्हाध्यक्ष पदासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, भाजप पंचायतराज आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, साताऱ्याचे माजी शहराध्यक्ष विकास गोसावी यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. या नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या यादीत भाजपचे कट्टर कार्यकर्ते दत्ताजी थोरात व रवी पवार यांचीही नावे चर्चेत आल्याने भाजपमध्ये नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार की निष्ठावंतांना त्यांच्या कामाची पोच पावती देणार हे पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील काटकर यांनी केलेल्या कामाची नोंद प्रदेश कार्यकारिणीने घेतली असल्याचे सांगण्यात येते. रणजित फाळके यांनी राज्य पातळीवर पक्षाची उत्तम बांधणी केली. जयकुमार शिंदे यांनी माढा लोकसभा व फलटण विधानसभा मतदारसंघात भाजपची लढाई एकहाती सांभाळली. रामकृष्ण वेताळ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी दावेदार होते. सातारा शहराध्यक्ष म्हणून विकास गोसावी यांनी पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये सातत्यपूर्ण काम ठेवणे या सर्व उमेदवारांच्या कामाची दखल आणि त्याचा आढावा रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि नव्याने प्रवाहात सामील होणारे कार्यकर्ते यांची नवी जुनी सांगड आणि समन्वय घालून कार्यकारिणी बांधण्याची आणि निवड करण्याची कसरत रवींद्र चव्हाण यांना करावी लागणार आहे.
साताऱ्यात आता दोन शहराध्यक्ष
सातारा शहरात पूर्व आणि पश्चिम मंडलाध्यक्ष असे दोन विभाग केले जाणार आहेत. त्याकरता सुद्धा 11 उमेदवारांनी नावे नोंदवली आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यस्तरावर सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला. सातारा जिल्ह्यातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्या ठिकाणी जिल्ह्यात एक मंडल होते, तेथे आता दोन मंडले तयार करून कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे साताऱ्यात दोन शहराध्यक्ष दिसणार आहेत.
या निवडीनंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडी केल्या जातील. कदाचित 22 एप्रिलनंतर या निवडी जाहीर होतील अशी चर्चा आहे. या बैठकीमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांचीही मते प्रदेश कार्यकारिणीने जाणून घेतली आहेत. तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे पक्षाच्यावतीने नवीन जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.