डॉ. कैलास काटकर; “क्विक हील’चे काटकर बंधू “सातारा भूषण’ने सन्मानित
सातारा –“क्विक हील’ कंपनीच्या उभारणीत अनंत अडचणी आल्या तरी भविष्यातील तंत्रज्ञानावरील संशोधनात्मक मांडणीचा ध्यास कधी सोडला नाही. आज “क्विक हील’ कंपनीच्या जगभरात 26 शाखा आहेत. आमच्या कौशल्याची दखल सातारा भूषण पुरस्काराने घेण्यात आल्याचा सर्वाधिक आनंद आहे. हा पुरस्कार आमच्या मातीतला पुरस्कार आहे, असे भावोद्गार क्विक हीलचे संस्थापक डॉ. कैलास काटकर यांनी काढले.
येथील रा. ना. गोडबोले ट्रस्टच्यावतीने देण्यात येणाऱ्या सातारा भूषण पुरस्काराने जगद्विख्यात क्विक हील अँटीव्हायरस सिस्टीमचे प्रवर्तक डॉ. कैलास काटकर व संजय काटकर या बंधूंना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, रामनामी शाल व तीस हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले, विश्वस्त अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले व व उदयन गोडबोले उपस्थित होते. डॉ. काटकर म्हणाले: एकविसाव्या शतकाकडे बघताना तंत्रज्ञान सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान व्हायरसमुळे उभे राहिले. भारतासारख्या देशाला व्हायरसमुक्त तंत्रज्ञानाची गरज आहे.
26 शाखांमध्ये विस्तारलेल्या क्विक हील कंपनीची उभारणी 26 वर्षांपूर्वी करताना अनंत अडचणी आल्या. त्यावर मात करून पुढे गेलो. पुण्यात खूप पुरस्कार मिळाले तरी सातारा भूषण पुरस्कार हा आपल्या मातीतला पुरस्कार असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुरुवातीला रेडिओ दुरुस्त करताना हलाखीत दिवस काढावे लागले. सातारा भूषण पुरस्कार हा कुटुंबातील माणसांमध्ये झालेला सत्कार आहे. त्याचे मोल करता येत नाही. या पुरस्काराने पूर्णत्वाचे समाधान दिल्याचे उद्गार संजय काटकर यांनी काढले.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, साताऱ्याच्या सामाजिक जडणघडणीत गोडबोले कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. काटकर बंधूंचा सत्कार म्हणजे जिल्ह्यात लपलेल्या गुणवत्तेचा सत्कार आहे. जगात पाच माध्यम क्रांती झाल्या. आजच्या तंत्रज्ञानयुक्त जगात सायबर हल्ला झाला नाही, असे एकही क्षेत्र नाही. क्विक हीलची तंत्रज्ञान सुरक्षा हे त्याचे उत्तर आहे. काटकर बंधूंचा धागा रयत परिवाराशी जोडला गेला ही आनंदाची गोष्ट आहे. प्रा. बानुगडे म्हणाले, काटकर बंधू हे साताऱ्याचे जॅक मा आहेत.
त्यांच्यामुळे रहिमतपूरला वेगळी ओळख मिळाली आहे. जगात सर्वच क्षेत्रात वाढत असलेले सायबर सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन जगातील संगणक आणि विविध गॅझेटस् व्हायरसमुक्त करणाऱ्या काटकर बंधूंचे काम मोठे आहे. नवनवीन कल्पना सुचणे हाच मोठा विजय आहे.अरुण गोडबोले यांनी प्रास्ताविकात सातारा भूषण पुरस्काराची माहिती दिली. खटाव तालुक्यातील ललगुण या छोट्या गावातील मूळ रहिवासी असलेल्या आणि रहिमतपूर येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्रांनी क्विक हील अँटीव्हायरस तयार करून सर्वोच्च दर्जा, स्नेहपूर्ण आणि त्वरित सेवा ही त्रिसूत्री जपल्याने त्यांच्या सॉफ्टवेअरला जगभरातील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या कंपनीची घोडदौड वेगाने सुरू आहे. तज्ज्ञ अभियंते व प्रशिक्षित स्टाफच्या माध्यमातून क्विक हील टेक्नॉलॉजी कोट्यवधी ग्राहकांची आणि मोठ्या संगणक कंपन्यांची सेवा करत आहे. नवनवीन संशोधन व अद्ययावत उत्पादनांद्वारे जागतिक स्पर्धेला तोंड देत कंपनीने आपले अग्रस्थान जागतिक पातळीवर कायम राखले आहे, असे गोडबोले म्हणाले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. गोडबोले परिवाराच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, पत्रकार विजय मांडके, पी. एन. जोशी, उद्योजक श्रीकांत जोशी, डॉ. रवींद्र हर्षे, नंदकिशोर नावंधर, प्रा. अविनाश लेवे, प्रद्युम्न गोडबोले, डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. सौ. अनुराधा गोडबोले, संजीवनी गोडबोले, प्रियंवदा गोडबोले, गौतम भोसले, जयवंत चव्हाण, वासुदेव कुलकर्णी उपस्थित होते. दरम्यान, कलात्मक सन्मानपत्रे तयार करणारे रवींद्र झुटिंग यांचाही सत्कार करण्यात आला.