पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
रासकरमळ्यात पुलावर कठड्याला बस धडकली
खळद – सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर गुरुवारी (दि. 18) खळद रासकरमळा येथील पुलावर एस. टी. बस कठड्याला धडकल्याने सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सासवड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धोंडीबा धुमाळ व्यंकट (वय 60, रा. बाळु पाटलाचीवाडी), बाळासाहेब महादेव पवार (वय 70, रा. वाल्हा), शोभा महादेव साठे (वय 55, रा. निरा), महादेव भिकाजी साठे (वय 66) हनुमंत नागा रेड्डी (वय 23, मंगळवेढा), प्रभाकर आनंदराव साळुंखे (वय 75, रा. वढु खुर्द), डॉ. शांताराम कुदळे (वय 45, रा. कोळविहिरे) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. राजापूर आगाराची एसटी बस पंढरपूरकडून स्वारगेटच्या दिशेला जात होती. त्यावेळी रासकरमळा येथील पुलावर समोरून वेगात बस आल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बसमध्ये चालक, वाहकासह 39 प्रवासी होते. यातील सात जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील अर्धवट व अपुऱ्या कामांमुळे येथे रोज अपघात होत आहेत. पुलाचे अर्धवट काम तसेच लोखंडी सळईचे बार पुलातून बाहेर आले आहेत. त्याचा मोठा धोका असल्यामुळे लवकरात लवकर सर्व अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.