महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण, समाजकारण, शहर खेडी यांची उभारणी, शेती-पाणी याचबरोबर सर्व क्षेत्रांत पुरोगामी विचार घेऊन उभारणी व्हावी. सोबत सुसंस्कृत, विकासाची दृष्टी असली पाहिजे. साहित्य, कला, माणूसपण व सकलांना घेऊन चालण्याची नितळ दृष्टी असली पाहिजे. तरच महाराष्ट्र व देश मोठा होईल. खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब सातत्याने लिहीत, बोलत. त्यांच्यासोबत राजकारणात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्यासारखी माणसे, नेते, तरुण उभे केले. तेच ब्रीद घेऊन शरद पवार यांनीही याच विचारांची उभारणी करताना तरुणांना शक्ती दिली. असे जे काही तरुण, नेते, कर्ते पुढारी महाराष्ट्रात आहेत. त्यातले एक ठळक नाव म्हणजे आम्हा आंबेगावकरांचा सार्थ अभिमान कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील. सन 1990 मध्ये आंबेगाव तालुक्यात उदयाला आले युवा नेतृत्व. या नेतृत्वाने आपल्या वाटचालीत अफाट कर्तृत्व दाखवून दिले आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभलेल्या शेतकरी कुटुंबात झाला. बीए.एलएलबी, एलएलएमपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर थोड्याच दिवसांत शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. स्वकर्तृत्वाने शरद पवार यांचा विश्वास संपादन केला. 1990मध्ये आंबेगाव मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 1999मध्ये ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाले. मंत्री वळसे पाटील हे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष असून, त्यांनी याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शैक्षणिक योजना आणि आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि ऊर्जामंत्री ही पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. यानंतर विधानसभा अध्यक्षपदाला मोठी उंची गाठून दिली. आजही त्यांच्याकडे कामगार व उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती आहेत.
महाराष्ट्राला शिक्षणाची दीर्घ परंपरा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत (पान 1 वरून) महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे श्रेय मंत्री दिलीप वळसे पाटील यांना द्यावे लागते. मंत्री वळसे पाटील यांनी 1999मध्ये उच्च शिक्षण खात्याची धुरा हाती घेतल्यानंतर उच्चशिक्षण क्षेत्रात काही सकारात्मक बदल घडवून आणले. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये गेल्या काही वर्षात मोजक्या आमदार आणि मंत्रिमहोदयांनी आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा आणि कौशल्यपूर्ण कार्यशैलीचा ठसा उमटवलेला आहे. त्या मंत्र्यांमध्ये वळसे पाटील साहेबांचा नंबर लागतो. ते आपल्या अखत्यारीतील सर्व विषयांचा सखोल अभ्यास व चिंतन, मनन करून विधानसभेत निवेदन करतात. या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले. साहेब अत्यंत नशीबवान आहेत की त्यांना किरणताईंसारखी मनमिळावू, बोलकी आणि सर्वांचे आगत-स्वागत करणारी सहचारिणी लाभली. राजकारणी व्यक्तींना घरात लक्ष द्यायला वेळ नसतो आणि किरणताईही ही उणीव कधीच भासू देत नाहीत.
सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न
कार्यक्षम, अभ्यासू आणि जनतेचे हित पाहणारा नेता असा मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राज्यात नावलौकिक आहे. आंबेगाव तालुका प्रगतीत अग्रेसर राहावा, असा त्यांचा सतत प्रयत्न असतो. महिला सबलीकरण, गाव आणि वाड्या-वस्त्यांवर स्वच्छतागृह, प्रत्येक गाव हागणदारी मुक्त, तरुणांना व्यवसायासाठी परिसरात पायाभूत सुविधा, दूध आणि पोल्टी व्यवसायाला प्रोत्साहन, संगणक शिक्षणाचा प्रचार-प्रसार, आदिवासी भागात पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, भीमाशंकर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसलागवड, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, सत्कार समारंभाला फाटा, सामुदायिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिरे आदी महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी नजीकच्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा संकल्प वळसे पाटील यांनी जाहीर केला. माळीण गावात झालेल्या दुर्दैवी घटनेत जातीने लक्ष घालून आपत्तीच्या दिवसापासून ते पुनर्वसन यामध्ये वेगळेपण त्यांनी दाखवून दिले.
मतदारसंघाकडे बारीक लक्ष
राज्याचा व्याप सांभाळूनही त्यांनी आंबेगाव तालुक्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. गावाकडून मंत्रालयात असलेल्या नागरिकांची आस्थेवाईक चौकशी करून त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे काम ते सतत करीत असतात. या प्रचंड दगदगीत त्यांना खऱ्या अर्थाने मोलाची साथ मिळाली आहे ती पत्नी किरणताई आणि कन्या पूर्वा यांची. साहेबांची तब्येत व्यवस्थित राहावी. याबाबत त्या सतत काळजी घेतात. आलेल्या प्रत्येकाला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. साहेबांच्या यशामध्ये माय लेकीचा ही सिंहाचा वाटा आहे.
शंभर नंबरी सोने
2009 ते 2014 या कालखंडात विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारून या पदाची उंची वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी काम करीत असताना साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर काम केले. 14 ऑगस्ट 2017 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर साहेबांची निवड झाली. राष्ट्रीय साखर महासंघ अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यात राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि उद्योजक यांचे चांगले मिश्रण झालेले आहे. उमदे व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट आकलन, हाती घेतलेले काम नेटकेपणाने करण्याची पद्धत आणि याच्या जोडीला लोकसंग्रह सतत वृद्धिंगत करण्याचा ध्यास. यामुळे दिलीप वळसे-पाटील हे व्यक्तिमत्त्व एका वेगळ्याच मुशीतून तयार झालेले शंभर नंबरी सोने आहे.