एमआयटीतर्फे आयोजित राष्ट्रीय सरपंच संसदेचा समारोप
पुणे – नीतिमत्ता, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि वातावरण या गोष्टींवर सरपंचांनी भर दिल्यास गाव समृद्ध होईल. शिक्षण, आरोग्य, पाणी, क्रीडा, संस्कार, अध्यात्म आणि बाजारपेठसारख्या बहुअंगाने विचार करावा. शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा उपयोग करून गावाचा सर्वांगीण विकास करावा. आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी तपासावा, असा सल्ला केंद्रीय रस्ते दळणवळण आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सरपंचांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित ऑनलाइन दुसऱ्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी व पंचायतराज विभागाचे मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सरंगी, संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री हुकुमदेव यादव, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, खासदार पी. पी. चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल कराड, प्रमुख समन्वयक योगेश पाटील, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, संचालक रवींद्रनाथ पाटील, डॉ. शैलश्री हरिदास उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, सरपंच हा भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा आहे. आत्मनिर्भार भारत, निर्मलग्राम व स्वच्छ भारत या योजना राबविण्याचे कार्य सरपंचांनी योग्य प्रकारे करावे.
राहुल कराड म्हणाले, सरपंचाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही संसद भरविली जात आहे. संसदेच्या मंचावर मान्यवरांचे मार्गदर्शन, शासन योजनांची माहिती आणि भविष्यात ग्राम विकास कार्यपद्धती सारख्या अनेक विकासात्मक गोष्टींना सरपंच आपल्या गावात मूर्त रूप देऊ शकतो.