वाघळवाडी – मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी (दि. 9) आयोजित केली होती. परंतु, खुद्द सरपंचांसह बहुसंख्य सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभा पुन्हा तहकूब करण्याची नामुष्की आली. गाव विकासाच्या पंचवार्षिक आराखड्याची महत्त्वपूर्ण सभा गांभीर्याने घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी जमत नसेल तर सरपंचांनी राजीनामा द्यावा, असे स्पष्ट मत कामकाजात नोंदविले.
दि. 29 नोव्हेंबरला वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व आपला गाव, आपला विकास योजनेअंतर्गत पंचवार्षिक कृती आराखड्यास मंजुरी घेणे अशा महत्त्वाच्या विषयावरील ग्रामसभा तहकूब करावी लागली. सोमवारच्या सभेसाठी सरपंचांच्या सहीने नोटीस काढली होती, दवंडी देणारी गाडीही फिरविली होती; पण, सरपंच व नऊ सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभा पुन्हा तहकुबीची नामुष्की आली. ग्रामस्थ व इतर व्यक्ती नोटीसप्रमाणे दहा वाजताच उपस्थित होते. बराच वेळ वाट पाहिली तरी सरपंच व इतर सदस्य आले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. सरपंचांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव ग्रामसेवकांनी लिहून व वाचून दाखविला. त्याला गावातील काही ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.
सभा पुन्हा एकदा तहकूब; राजीनामा देण्याची मागणी
सभेला सरपंच अध्यक्ष असतात. सदस्यांना कायदेशीर बंधन नाही; परंतु नैतिकदृष्ट्या हजर राहणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी पत्र दिल्यास पुढील सभेला पंचायत समितीच्या वतीने अधिकारी पाठविता येतील.
– प्रमोद काळे, गटविकास अधिकारी
मी मागासवर्गीय महिला सरपंच असल्याने काही ठराविक लोकांकडून मला टार्गेट करण्यात येत आहे. गावची लोकसंख्या सहा हजार असून मी थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहे. दोन-चार लोकांच्या सांगण्यावरून सरपंचपदाचा राजीनामा देण्याचा किंवा मागण्याचा प्रश्नच नाही.
– इंदुमती भगत, सरपंच, मुरुम