बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातल्याच सरपंचासह इतर काही माणसांकडून या महिला वकिलाला काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर या वकील महिलेचं अंग काळंनिळं पडलं आहे. लाऊडस्पीकर लावू नये, अशी तक्रार केल्यानं या महिला वकिलाला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत.
घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा, अशी विनंती या वकील महिलेकडून गावातील सरपंचाकडे करण्यात आली होती. यानंतर सरपंचाकडून यासंदर्भात टाळाटाळ करण्यात आली. इतकंच नाहीतर त्यांच्याकडून या महिलेला पोलिसांत तक्रार कर असं सांगितलं. यानंतर महिलेला त्रास होत असल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर संतापलेल्या सरपंचासह गावातील काही लोकांनी या महिलेला एका शेतात नेत रिंगण करून अमानुष मारले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं जबर मारहाण करण्यात आली. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे.
सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवाल आव्हाड यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि बीड जिल्हा वकील संघाकडं केला आहे.