औरंगाबाद : देशात कोरोनाचे संकट असतानाच राज्यात आणखी एका नव्या रोगाचे संकट निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये सारीचे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सारी रोगामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ मार्चला पहिला सारीचा दगावला होता. त्यानंतर २९ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान या दहा दिवसात सारी रोगाने ११ रुग्ण दगावल्याची माहिती मिळते आहे.
यावर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले कि, “औरंगाबादमध्ये ‘सारी’ रोगाचे रुग्ण आढळले आहेत. त्यावर लवकर उपाय शोधणे गरजेचे आहे”. औरंगाबाद शहरात ‘सारी’ रोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त आहे. एका कोरोना बाधितामागे ५ रुग्ण ‘सारी’ रोगाचे आहेत. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. दोन्ही आजाराची लक्षणे सारखीच असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.
कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच असल्याने नेमक्या कोणत्या विषाणूची लागण झाली आहे, हे लवकर स्पष्ट होत नाही. सारीचा आजार श्वसनासंबंधी असल्याने रुग्णाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता यात खूप कमी होते. अशा रुग्णांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. तर काही रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये पाणी निर्माण होऊन फुफ्फुसाला सूज येण्याची शक्यता असते. यालाच सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस सारी म्हणतात. जागतिक आरोग्य संघनटनेने दिलेल्या माहितीनुसार सारी’ रोगामुळे दरवर्षी जगभरात 40 लाख जणांचा मृत्यू होतो.