जयंत माईणकर
महाशिव आघाडी! शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी यांच्यानंतर महाराष्ट्रात कदाचित बनणाऱ्या नव्या आघाडीचं पत्रकारांनी ठेवलेलं नाव! 105 सदस्य घेऊन प्रथम क्रमांकावर आलेल्या भाजपला वगळून 50 या सदस्यसंख्येच्या आसपास असलेल्या तीन पक्षांच्या दीड विचारसरणीची ही मोट बांधली जाईल?
सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि तरीही बहुमतापासून वंचित राहिलेल्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांनी आपापसातील तात्त्विक मतभेद विसरून एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही.
असा पहिला प्रयत्न 1977 ला जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी झाला होता. त्यावेळी समाजवादी, जनसंघ आणि असंतुष्ट कॉंग्रेस नेते एकत्र येऊन कॉंग्रेस विरोधी पक्ष स्थापन केला होता. पण हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर आपापसातील मतभेदांमुळे 28 महिन्यांत सरकारसह गडगडला. नंतर चरण सिंग यांना कॉंग्रेसनी दिलेला पाठिंबा सात महिन्यांत काढून घेतला. आधीच्या अनुभवांनी, 1989 साली पक्ष विलीन न करता मूळचे कॉंग्रेसी असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दल, कम्युनिस्ट आणि भाजप यांनी कॉंग्रेस विरोधी आघाडी करून केवळ 11 महिने सरकार चालविले. त्यानंतर कॉंग्रेसने पाठिंबा दिलेले चंद्रशेखर सरकार केवळ 4 महिने चालले.
कॉंग्रेसच्या नरसिंह राव यांचे सरकार बहुमतापासून 30 ने दूर असूनही पाच वर्षे चालले. मात्र 1996 पासून देशात एक अस्थिरता बघायला मिळाली. आतापर्यंत कॉंग्रेस विरोधात एक होणारे पक्ष आता भाजपविरोधी म्हणून एक होऊ लागले. 1996 ते 98 या काळात भारताने चक्क तीन पंतप्रधान पाहिले. त्यांचा कालावधी 13 दिवसांपासून 9 महिन्यांपर्यंत होता. 1998 पासून 2004 पर्यंत भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी सरकार टिकवू शकले तरीही मध्ये 1999 साली त्यांनाही अवघ्या तेरा महिन्यांत मध्यावधी निवडणूक घ्यावी लागली होती. अगदी इतक्यात कर्नाटकात 80 आमदार कॉंग्रेसचे आणि 37 जनता दल (से) सरकार सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षात कोसळले. यामागे 14 आमदारांचा भाजपने घडवून आणलेला राजीनामा हे कारण असले तरीही आपल्याकडे संख्या जास्त असूनही मुख्यमंत्री पद आपल्याकडे का नाही म्हणून कॉंग्रेस आमदार नाराज असणं हेही एक कारण होतं. या नाराजीचाच फायदा घेत भाजपने 14 आमदारांचा राजीनामा घेतला.
ही पाच उदाहरणे हेच दाखवतात की कॉंग्रेस जर सत्तेत प्रमुख स्थानी असेल तरच ते सरकार स्थिर राहतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेनेच्या 56 आमदारांच्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार ज्यात राष्ट्रवादीचे 54 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार असतील ते सरकार चालेल का, हा खरा प्रश्न आहे. हिंदुत्व, समान नागरी कायदा, राम मंदिर यासारख्या विषयांवर या तीन पक्षात कमालीचे मतभेद आहेत. याशिवाय शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे “जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे’, असं म्हणणं आणि सावरकरांना भारतरत्न देण्याला हुसेन दलवाई यासारख्या नेत्यांचा असलेला विरोध या गोष्टी पाहता हे सरकार अस्तित्वात आले तरी फार काळ टिकेल असे वाटत नाही, असा एक प्रवाह आहे. याच दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी यांची होऊ शकणारी युती त्याबदल्यात 2022 ला पवारांना राष्ट्रपती पद यासारखे पतंग उडवले जात आहेत. पण यात अजिबात तथ्य नाही.
महाशिवआघाडी आल्यास कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते आणि मार्च महिन्यात राज्यपालाद्वारे नियुक्त होणाऱ्या 12 जागा, इतर मंत्री पदे हे तीन पक्ष वाटून घेऊ शकतात. पण शिवसेना आणि इतर दोन पक्षातील असलेला तात्त्विक विरोधाभास, शिवसेनेशी असलेल्या आघाडीमुळे कॉंग्रेसच्या दिल्ली आणि इतर राज्यातील मुस्लीम मतांवर होणारा परिणाम पाहता हे महाशिवआघाडी सरकार येणं आणि टिकणं यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. ही तीन पक्षांची खिचडी सध्या तरी बिरबलाच्या खिचडीप्रमाणे शब्दांच्या उबेवर बनत आहे. तिला एक महिना झाला तरीही वास्तविकतेचा चटका लागलेला नाही आणि जोपर्यंत खरोखर चटका लागत नाही तोपर्यंत ही खिचडी शिजणार नाही.
कॉंग्रेसचा आधीचा अनुभव लक्षात घेता हे सरकार अस्तित्वात आले तरीही टिकण्याची शक्यता कमीच आहे, असे म्हटल्यास कोणी हरकत घेण्याचे कारण नाही. याव्यतिरिक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्री असलेल्या चव्हाण जोडीला आणि राष्ट्रवादीतील अजित पवार आणि छगन भुजबळ या उपमुख्यमंत्री जोडीला सांभाळणे आणि या चौघांच्या इगोला धक्का लागू न देण्याची तारेवरची कसरत शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे.
याबरोबरच या दोन्ही पक्षात ज्येष्ठ आमदार मंत्र्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे तीसुद्धा एक डोकेदुखी ठरू शकते. त्याचबरोबर हे, राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री पदावर आपला दावा किमान अडीच वर्षासाठी ठेवू शकतात. एकूणच ही बिरबलाची न शिजलेली खिचडी कशी बनते हे पाहावे लागेल.