कर्मचाऱ्यांकडून एक महिन्याचे मानधन : तीनशे विद्युत मोटारीही देणार
सातारा – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून सर्व सदस्य एक महिन्याचे मानधन तर कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कृषी विभागामार्फत कराड, पाटणसह उर्वरित पूरग्रस्त तालुक्यांमध्ये 95 टक्के अनुदानावर 300 विद्युत मोटारीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी सभापती मनोज पवार यांनी दिली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदस्यांनी एक महिन्याचे मानधन व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मांडली. त्यावर सर्व सदस्य व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. पूरस्थितीमुळे विद्युत मोटारींचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा मुद्दा मानसिंगराव जगदाळे यांनी उपस्थित केला. त्यावर 300 विद्युत मोटारी 95 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतील. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी मागणीसाठी पंचनामा प्रत व लाईट बिलासह आजपासूनच अर्ज करावेत, असे कृषी सभापती मनोज पवार यांनी सांगितले.
पूररेषेच्या परिसरातील घरांसाठी नवीन गावठाण विकसित करून त्या ठिकाणी पुनवर्सन करण्यात यावे, अशी मागणी कराड पंचायत समिती सभापती फरिदा इनामदार यांनी केली. जिल्ह्यातील रस्ते, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती नुकसानीबाबत लवकरच कृषी विभागासोबत संयुक्त बैठक आयोजित करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे सांगून संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेच्या नुकसान झालेल्या रस्त्यांचा त्याचबरोबर कमी उंचीच्या पुलांचा आढावा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज काढले. मात्र, शेतीतील पिके संपुष्टात आली आहेत. अशा वेळी पेरणीसाठी घेतलेले कर्जमाफी करण्याचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी उदयसिंह उंडाळकर-पाटील यांनी केली. तो ठराव मंजूर करून शासनास पाठविण्यात येईल, असे संजीवराजे यांनी सांगितले.
चार तालुक्यांना विशेष पॅकेज हवे
पुराच्या कालावधीत जिल्हा परिषदेकडून चांगल्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी श्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सदस्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिमेला ओला दुष्काळ जाहीर करण्यासह राष्ट्रीय आपत्तीची घोषणा करण्याच्या मागणीचा ठराव करण्याची मागणी सदस्यांनी केली. जिल्ह्याच्या पूर्वेला दुष्काळ पडतो तेव्हा सरकार मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करते. त्याच धर्तीवर महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि कराड तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी सरकारने चारही तालुक्यांना मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी वसंतराव मानकुमरे यांनी केली.