मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी आपली पत्नी व बहिणीसोबत देवदर्शन घेतले. देवदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी ‘आला रे आला, गद्दार आला’, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेवर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हल्ल्याविषयी बोलताना संतोष बांगर यांनी,”अमरावती दौऱ्यावर आल्यावर मी माझी बायको आणि बहीण आम्ही तिघे देव दर्शनाला गेलो होतो. देवदर्शन करून बाहेर पडल्यानंतर दहा-पाच लोकांनी नारेबाजी करत माझ्या गाडीवर हाताने मारण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं की याला हल्ला म्हणता येणार नाही, हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो.
तसे पुढे बोलताना त्यांनी, “हा चोरपणा आहे. पूर्वीच्या काळी डाका टाकला जायचा. डाका (दरोडा) कशाला म्हणतात, तर घराच्या पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचं की मी तुमच्या घरावर डाका टाकतोय. तो पूर्वीचा काळ होता. पण हे म्हणजे चोर प्रकरण आहे. हे मर्दानगीचं काम नव्हे. माझी बहीण आणि माझी पत्नी गाडीत नसती तर संतोष बांगर काय आहे? हे मी त्यांना सांगितलं असतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी संतोष बांगर यांनी,“माझ्या गाडीला कुणी स्पर्शही केला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही” अशा आशयाचं वक्तव्य केले होते. त्यानंतर रविवारी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. याविषयी संतोष बांगर म्हणाले की, आजही मी तुम्हाला सांगतो, ज्या मतावर बोललो होतो, त्यावर मी ठाम आहे. आजही माझ्या गाडीला स्पर्श करून दाखवा, हा संतोष बांगर जे बोललाय ते केल्याशिवाय राहणार नाही, असे बांगर म्हणाले.