मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढीत करणार प्रकल्पाची घोषणा
सोलापूर – वारकरी संप्रदायाचा अभ्यास जगभरातील विचारवंतांना करता यावा यासाठी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व पर्यटन विभाग यांच्यावतीने “संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्यात येत आहे. याचा आराखडा तयार असून लवकरच कामास सुरूवात होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला आषाढीत घोषणा करतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
हे संतपीठ येथील मंदिर समितीच्या ताब्यात असणाऱ्या पर्यटन विकास महामंडळाच्या एमटीडीसीच्या जागेवर उभारण्यात येत आहे. यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला आहे. समिती व पर्यटन विभाग दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे संतपीठ उभा केले जाणार आहे. यासाठी मंदिरे समितीने मागील वर्षी राज्यातील संत साहित्याच्या अभ्यासकांची व विचारवंतांची एक स्वतंत्र सल्लागार समिती ही नियुक्त केली आहे. मंदिर समिती कायद्यात संतपीठ उभा करण्याची तरतूद आहे.
संपूर्ण जगात नॉलेज सेंटर म्हणून ओळख बनवू शकणाऱ्या या संतपीठाची घोषणा आषाढी एकादशीला मुख्यमंत्री घोषणा करणार असून यासाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वारकरी संप्रदायाची ओळख, परंपरा, संस्कृती आणि विचार पुढील पिढीला समजावेत यासाठी हे संतपीठ मोलाचे ठरणार आहे. यामुळे देशभरातील नव्हे तर जगातील अभ्यासकांना व संशोधकांना याचा लाभ होणार आहे. हे संतपीठ आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असणार आहे.