उरुळी कांचन – ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरळी कांचन (ता. हवेली) गावात परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार आहे. असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. यामुळे विठुरायाच्या भक्तांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.
जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळा प्रमुख व देहू संस्थांनचे विश्वस्त मंडळाने हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर व उरुळी कांचन येथील मुक्काम व विसावा स्थळावरील पालखी सोहळ्यातील व्यवस्थेत केलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्या समवेत झालेल्या नियोजन बैठकीत प्रशासनाने यशस्वी तोडगा काढण्यात प्रशासनाने यश मिळविले आहे.
उरुळी कांचन शहरातील विसाव्यासाठी पालखी गावाला प्रदक्षिणा घालून महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर विसाव्यासाठी थांबणार असल्याचे बैठकीत सुनियोजित करण्यात आले आहे. त्यामुळे पालखी सोहळा नियोजनावरुन पालखी सोहळा समिती व ग्रामस्थ यांच्यात विसंगवाद दूर होण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत.
ग्रामस्थांनी यासंदर्भात उरुळी कांचन येथे एक बैठक घेतली होती. जर पालखी सोहळा परंपरेनुसार गावात आला नाही तर सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. आज अखेर संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पालखी सोहळा परंपरेनुसार ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेणार असून, त्यानंतर पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी २ तास थांबणार आहे, असे जाहीर केले आहे.
यंदाच्या सोहळ्यासाठी लोणीकाळभोरला पालखी सोहळा पालखी सोहळा पालखी स्थळावर मुक्कामी तर उरुळी कांचन येथे गाव प्रदक्षिणा न घालता पालखी सोहळा हा राष्ट्रीय महामार्गावर विसाव्यासाठी थांबणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु लोणीकाळभोर ग्रामस्थांनी परंपरेने हा सोहळा विठ्ठल मंदिरात तर उरुळी कांचन ग्रामस्थांनी श्री काळभैरवनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून यवतला मुक्कामी प्रस्थान ठेवावे अशा मागण्यांवरून सोहळा प्रमुख व ग्रामस्थ यांच्यात नियोजनावरुन विसंगवाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची मागणीचा विचार घेऊन हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी संजय आसवले यांनी सोहळा प्रमुख व ग्रामस्थांची दुसऱ्यांदा बैठक उप विभागीय कार्यालयात मंगळवारी (ता.०६) बोलविली होती. यावर दोन्ही बाजूंकडील नियोजन व त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली. यावर वारकरी संप्रादायाचा , श्रध्देचा व परंपरेचा विचार करुन काही बदल करुन सोहळा संपन्न करण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत संजय आसवले यांनी प्रशासन सुसज्ज व्यवस्था निर्माण करणार असल्याचा विश्वास देऊन ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वयातून सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगितले. अखेर प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मागणीचा विचार करुन सोहळा समितीने लोणीकाळभोरला पालखी सोहळा विठ्ठल मंदिर मुक्कामासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय कळविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर उरुळी कांचन विसाव्यासाठी गाव प्रदक्षिणा घालून काळभैरवनाथ मंदिरात आरती घेऊन महात्मा गांधी विद्यालय मैदानावर विसावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या नियोजनाच्या विसंगवादासाठी तोडगा काढण्यासाठी जिल्हा बँके चे संचालक प्रदीप कंद यांनी प्रयत्न केले. या बैठकीसाठी तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी भूषण जोशी, पालखी सोहळा समितीचे संजय मोरे, अजित मोरे, भानुदास मोरे, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सदस्य भाऊसाहेब कांचन तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.