आळंदी (एम. डी. पाखरे) – फुलांची आकर्षक तोरणे…रांगोळ्याच्या पायघड्या…आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी… माऊली नामाचा अखंड गजर…अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात, टाळ मृदंगाच्या गजरात “पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषात राज्य परिवहन महामंडळाच्या सजविलेल्या शिवशाहीमधून “माऊलीं’च्या चलपादूका “शिवशाही’ थाटात आजोळ घरातून पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रित 40 वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा तब्बल 17 दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून सोमवारी (दि. 19) आषाढ शुद्ध दशमीला सकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी, सोमवारी पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरात माऊलींच्या पादुकांना पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे – पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर प्रमुख ब्रह्मवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सकाळी सातच्या सुमारास माऊलींच्या चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडली.
दरम्यान, रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी गरुड परिवाराच्या वतीने सजविलेल्या दोन्ही शिवशाही बस पोलीस बंदोबस्तात आजोळ घराबाहेर आणून सज्ज करण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून बसमध्ये प्रवेश दिला. सकाळी ठिक नऊ वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर माऊलींच्या पादुका घेत बसचे दिशेने निघाले. आणि उपस्थितांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय अशा जयघोषात आषाढी बसवारी सोहळा पोलीस बंदोबस्तात आजोळ घरापासून नगरपालिका चौकातून इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे पंढरपूरकडे रवाना झाला.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आदी उपस्थित होते.
…अन् वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या
प्रतिवर्षी लाखोंच्या सोहळ्यातील पायी चालताना येणाऱ्या वारीच्या आनंदास सलग दुसऱ्या वर्षी मुकावे लागले. परिणामी बसने वारी करावी लागली. सोमवारीही शिवशाही आजोळघरापासून पंढरीकडे मार्गस्थ होताच आळंदीकरांनी जड अंतकणाने हात उंचावत “माऊली माऊली’चा गजर करून माऊलींना निरोप दिला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा माऊलींच्या बसचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांसह शिवशाहीतील वारकऱ्यांनीही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
एका शिवशाहीत 20 वारकरी
दोन शिवशाही बसमधून 40 वारकऱ्यांना विभागून 20-20 अशी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यासोबत एक जादाची शिवशाही म्हणजेच सर्व्हिस व्हॅन देखील उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांसाठी पुरी भाजी, खिचडी, केळी, व फळांची व्यवस्था करण्यात आली होती.