हडपसर : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण भक्तीमय झाले होते. पालखी आगमनाच्या वेळीच आकाशात ढग दाटून आले होते. सुरवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या नंतर पालखीच्या स्वागतासाठीच जणू वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. तरीही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. भर पावसातही तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
ध्यास एक, आस एक, अट्टहास एक, मैलोन् मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज हडपसरमध्ये दाखल झाल्या. गेली काही दिवसांपासून दोन्ही पालख्यांच्या स्वागताची उत्साहात तयारी सुरू होती. पोलीस व पालिका प्रशासन, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते.
पालखी सोहळा हडपसर विसाव्यावर पोहोचण्याच्या आधीच वारकऱ्यांचे जथ्थे सकाळपासूनच हडपसरच्या दिशेने येत होते. भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. हडपसर, मांजरी बुद्रुक -खुर्द ,शेवाळेवाडी केशवनगर,मुंढवा व आसपासच्या परिसरातून आलेले नागरिक मोठ्या भक्तिभावाने त्यांचे स्वागत करत होते. सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे तासभर विसाव्यावर माऊलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर १०.०० वाजण्याच्या सुमारास सासवड मुक्कामी माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तर ११.४५ च्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी गाडीतळ येथे विसाव्यावर दाखल झाली.
पालखी विसाव्यावर दाखल होताच वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला. जय जय रामकृष्णहरीचा निरंतर नामजप, जोडीला टाळमृदंग, त्याच्या तालावर डोलणारी पावले हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने गर्दी केली होती. मन प्रसन्न करणारी फुलांची आकर्षक सजावट, त्यावर केलेली फुग्याची आरास, हे सारे आपला कँमेरा व मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी दाटली होती. विठूनामाचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या उक्तीप्रमाणे त्यांची पावले भर पावसातही झपाझप आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पडत होती. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने लोणी काळभोर मुक्कामी प्रस्थान केले. वारीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भक्तांची संख्या मोठी असल्याचे पाहावयास मिळाले. वारकरी बांधवांनी दाटलेला गाडीतळ परिसर याची प्रचिती देत होता.
आजी- माजी आमदार व माजी नगरसेवकांनी स्वागत करून घेतले दर्शन
आमदार चेतन तुपे पाटील , माजी आमदार योगेश टिळेकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपायुक्त संदीप कदम, पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, वाहतूक शाखेच्या मनिषा झेंडे यांच्यासह ,अनेक माजी नगरसेवक ,विविध संस्था, संघटना व पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचा पालखीसोहळा आल्यानंतर पावसाने भाविकांना आपल्या सरींनी चिंब केले; मात्र यामुळे त्यांच्या उत्साहात कुठेही कमतरता नव्हती. याउलट पावसाच्या सरी अंगावर घेत मोठ्या आनंदाने ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्णहरी, बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्रीनामदेव तुकारामांचा गजर सुरूच होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ वारकरी यांचा सहभाग लक्षणीय होता.
वारकरी बांधवांचा पाहुणचार करण्यात वानवडी, हडपसर, मांजरी, शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांची अगत्यशीलता जागोजागी पाहावयास मिळत होती. पंढरीकडे प्रयाण करणाऱ्या वारकरी बांधवांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्याकरिता सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला होता. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले. यात तरुणाईचा सहभाग उत्स्फूर्त होता. अनेक माजी नगरसेवक ,विविध पक्षाचे पदाधिकारी व परिसरातील विविध संघटनांनी फराळाचे व पाण्याचे वाटप केले.