आळंदी – “विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली’ या उक्तीप्रमाणे अवघ्या काही तासांवर माऊलींची विठू भेट समीप आली आहे. सोमवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता “माऊली माऊली’च्या जयघोषात माऊलींच्या पादुका राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून मोजके मानकऱ्यांच्या उपस्थितीत आजोळ घरापासून पंढरीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, या पादुकांचे सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शीरसाठ, रामचंद्र नामदेव ईधारे हे करणार आहेत.
पोलिसांच्या कडक बंदोबस्तात शुक्रवारी (दि. 2) अलंकापुरीतून माऊलींच्या चलपादुकांचा प्रस्थान सोहळा पार पडला; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी रद्द झाल्याने माऊलींच्या पादुका आजोळघरी मुक्कामास आहेत. येथे विधीवत पूजा-अर्चा, भजन कीर्तन, जागर, महानैवेद्य, काकडा आदी नित्याचे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
माऊलींच्या पादुका सोमवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत, त्यामुळे माऊली मंदिरासह परिसरात रविवारी (दि. 18) पासून पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी आळंदी देवाची पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, अधिकारी त्याव्यतिरिक्त दोन अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त रविवार आणि सोमवार राहणार असल्याचे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.