कवि कालिदास संस्कृत विद्यापीठाचा पदवीदान समारोह संपन्न
मुंबई : लॅटिन व रोमन भाषा इतिहासजमा होत आहेत, परंतु संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे. अनेकदा लहान मोठ्या नद्या काही काळ लुप्त होतात आणि पुन्हा पुनरुज्जीवित होतात, त्याप्रमाणे संस्कृत भाषा लुप्त होत आहे असे वाटत असले तरीही ती सदा जागृत भाषा आहे. संस्कृत ज्ञानभाषा असून तिला राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल कोश्यारी तसेच पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव यांच्या आभासी उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
संस्कृत हृदयस्पर्शी भाषा असून ज्ञानाचा अथांग सागर आहे. गीता, उपनिषदे त्यातील मोती आहेत. संस्कृतमधील सुभाषिते अर्थपूर्ण आहेत. संस्कृत भाषेतील ज्ञान प्रकाशात आणून त्याचा प्रचार प्रसार कसा होईल याचा समग्र विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.