ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा
माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून जाहीर
पुणे – संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून कार्तिक वद्य त्रयोदशी, म्हणजेच 13 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण जगभर हा दिवस “विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी जाहीर केले.
श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळा विश्वदर्शन देवता मानवता मंदिर, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे झाला. यावेळी रामेश्वरम्चे ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण दशपुत्रे, अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख पुजारी पवन गुरुजी, इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, कृषीतज्ज्ञ डॉ. मुकुंद गायकवाड, डॉ. संजय उपाध्ये व माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण उपस्थित होते.
तसेच, माईर्स एमआयटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, स्वाती कराड-चाटे, उपाध्यक्ष व विश्वस्त ज्योती कराड-ढाकणे, उर्मिला कराड, उषा कराड, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि पंढरपूरचे दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी शिकवण दिली, त्या मार्गावर समाज चालला तर तो सुखी होईल. 724 वर्षांपूर्वी त्यांनी सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला. निसर्गाने करोनाच्या रुपात संपूर्ण जगाला दिलेली ही धोक्याची घंटा आहे. अशावेळी साधू, संत आणि महात्म्यांनी दिलेल्या संदेशाचे अनुकरण केल्यास मानवजातीचे कल्याण निश्चित होईल.