मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी काल माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर ‘एयू’ नावाने 44 कॉल्स आले होते. एयू म्हणजे ‘आदित्य उद्धव’ असे बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सादर केली. यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या या आरोपांचा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला असून, त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. यावेळी राऊत पत्रकारांशी बोलत होते. “फायलीचं राजकारण करू नका. अशा अनेक खूप फायली निघू शकतात. तुमच्या घरातील सुद्धा. ही फायलिंगची लढाई सुरू झाली तर सर्वांनाच महागात पडेल’, असा इशारा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “शेवाळेंनी जे आरोप केले. त्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. सुशांतसिंग राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशा पद्धतीने उभं केलं आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं, असं संजय राऊत म्हणाले.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला आहे. सुशांतने आत्महत्याच केल्याचं सीबीआयने सांगितलं. असं असतानाही ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंत अनेक आरोप आहेत अशा व्यक्तीने, आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर पणा आहे. असं संजय राऊत म्हणाले.
राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले…
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी तीन पातळ्यांवर झाली. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी झाली. मात्र, तिन्ही यंत्रणांकडून आलेल्या अहवालात तफावत आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयू नावाने 44 कॉल आले होते.
या एयू बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर, बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव आहे. याबाबत सीबीआयने अद्याप अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला 44 कॉल केलेला एयू नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.