मुंबई – सध्या राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते. यावरून संजय राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांना लगावला होता. त्यानंतर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र आता संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, “माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा हॉट आहे. त्यामुळे आम्ही दोघे पटकन रिेअॅक्ट होतो. अजित पवारांबद्दल मी कडक शब्दात बोललो त्याचा मला खेद वाटतो. यापुढे मी ठरवलं संपूर्ण भूमिका ऐकल्याशिवाय मी त्याविषयावर बोलणार नाही. अजित पवार हे मविआतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत,” असे विधान राऊत यांनी केले. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला.
संजय राऊत अजित पवारांना काय म्हणाले होते?
संजय राऊत यांनी काल श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा सल्ला टोला संजय राऊत यांना दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर देत म्हंटले होते की, “धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. सर्वांनी संयम तर राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगत आहोत.”