मुंबई – महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य विधानसभेत ठरेल. आघाडी विधानसभेत बहुमत सिद्ध करेल. बंडखोरांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीत आघाडी सरकारचे भवितव्य ठरणार नाही. बंडखोरांना इकडे यावेच लागेल, अशी परखड भूमिका पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नारायण राणे यांनी ट्विट केले की,’माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत,‘सभागृहात येऊन दाखवा’,ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.’ त्यांचा या ट्विटवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संजय राऊत यांनी सोशलवर पोस्ट करत मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. त्यांनी पोस्ट लिहिली आहे की,’महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही’ असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.