नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमलीपदार्थ रॅकेटबाबत एनआयने केलेल्या कारवाईत अनेक कलाकारांची नावे येण्याची जोरदार चर्चा आहे. अशातच सिनेसृष्टीला लागलेल्या अंमलीपदार्थांच्या काजळीवरून संसदेतील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत भूमिका मांडताना राज्यसभा खासदार ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी, ‘काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्री बदनाम होत आहे.’ असं म्हंटल होत.
जया बच्चन यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काही लोक बॉलिवूडबद्दल अपप्रचार करत असूनकेवळ चित्रपटसृष्टीच नाही तर आपली संस्कृती, परंपरा यांचीही बदनामी करत आहेत. बॉलिवूडमध्ये ड्रग्स रॅकेट चालत असल्याचं बोललं जात असून हे रोखण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे” असं राऊत यांनी म्हंटलंय.
यावेळी बोलताना राऊत यांनी, “ही इंडस्ट्री पाच लाख लोकांना रोजगार पुरवते. जर कोणी हे संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तिथेच रोखलं पाहिजे” असं मत देखील मांडलं.
काय म्हणाल्या जया बच्चन?
“मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा” असं मत जया बच्चन यांनी मांडलं.