मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतीच मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.
यातच या विधानावर आता शिवसेना नेता संजय राऊत यांनी हे शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनता घेईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे.