मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. त्यानुसार प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील मनी लॉण्ड्रींगमध्ये सहभागी होते असे दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होते, असे निरिक्षण नोंदवले आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“केंद्र सरकारने आधी दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसं भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. दाऊद कुठे आहे आणि काय करत आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे त्याला पकडून घेऊन या,” असे संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांचे शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्र सरकार चालू आहे. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे आम्ही ऐकत होते. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे नव्हते. पण अटल बिहारी वाजपेयी यांचे आदेश आम्ही पाळले. शरद पवार हे देशाचे जेष्ठ नेते आहेत. शरद पवारांचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांना राजकारणाची माहिती कमी आहे,” असे संजय राऊत म्हणाले.