मुंबई – राज्यात एकीकडे हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु असताना. ठाकरे गटाने तपास यंत्रणांच्या कारवायांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तब्बल पाचशे कोटींचा घोटाळा साखर कारखान्यामध्ये झाला असल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यात असलेल्या भीमा साखर कारखान्यात पाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. याबाबत तपशीलवार पत्र लिहीत राऊत यांनी फडणवीसांना संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून देखील राऊत यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.
“देवेंद्रजी भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा मनी लॉण्डरिंग व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे” अशा आशयाचा मजकूर लिहीत राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. यासोबतच राऊत यांनी या कारखान्यातील संचालक मंडळाची यादी देखील जाहीर केली आहे.
मा. देवेंद्र जी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@dir_ed@PMOIndia@AUThackeray@AjitPawarSpeaks@AmitShahOffice pic.twitter.com/1eJg969EBu— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
गेल्या काही दिवसांपासून विरोधक तपास यंत्रणांच्या वापराबाबत सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत होते. अनेकदा भाजपच्या आमदारांनी देखील भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले होते. आता संजय राऊत यांनी थेट फडणवीस यांना पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली. भाजपकडून आता यावर नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.