Sanjay Shirsat On Sanjay Raut | राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल काल (दि. 12) जाहीर झाला आहे. यात महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीतील तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा यामध्ये पराभव झाला. त्यामुळे महायुतीने महाविकास आघाडीला चांगला धक्का दिला आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. काल आमदारांना अमिष दाखवल्याचा दावा केला आहे. 20-25 कोटी रुपये एका मताला दिले गेले आणि 2 एकर जमीनही आमदारांना देण्यात आल्याचेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. संजय शिरसाट म्हणाले की, ‘संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचं वक्तव्य महत्त्व देण्यासारखं नसतं. तो पागल माणूस आहे.
विधान परिषदेच्या एक सदस्य त्याच्यासाठी 25-25 कोटी रुपये कोण देणार? असं कोण करतं? असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय. तर संजय राऊत यांनी केलेला आरोप हा मूर्खपणाचा आहे. पराभव यांना माहित होता, काँग्रेसला फोडण्याचं काम जर कोणी केलं तर ते उबाठा पक्षाने केलं त्यांच्या अस्तित्व यांनी धोक्यात आणलं असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले? पाहा….
“शेअर मार्केटसारखा अपक्ष आमदारांचा भाव काल वाढत होता. शिवसेनेकडे केवळ 15 मतं असतानाही मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील निवडून आले असते, पण गणित जुळले नाही. जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. जयंत पाटलांसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. ते महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक आहेत. शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण काही आमदारांना 2 एकर जमीन देखील दिली गेली.” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“जे आमदार धर्मनिरपेक्ष समजतात. समाजवादी विचाराचे समजतात असे अनेक आमदार आहेत. ते फुटले. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे. तो 20 ते 25 कोटीपर्यंत आहे. पण ही निवडणूक साधी सोपी नव्हती. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. आमच्याकडे जेवढी मते होती, त्या बळावर आम्ही निवडणूक लढवली, असं ते म्हणाले.
“मागील वेळेसही याच सात लोकांनी चंद्रकांत हंडोरे यांना पाडलं होतं. आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी यांचं कोणतंही मत फुटलेलं नाही. काँग्रेसचे ते सात जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते शरद पवार यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. पण आहे त्या मतांमध्येच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसा असता तर चित्र वेगळं असतं,” असं संजय राऊत म्हणाले.