मुंबई – करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून होत असलेला लसींचा पुरवठा यावरून राज्याचं राजकारण सध्या तापलं आहे. त्यातच करोना संसर्गावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
राऊत यांनी भिंडेंच्या वक्तव्याला धरून भाजपवरही कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी मत मांडताना महाराष्ट्रातील जनतेबद्दल अपशब्द उच्चारले. महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, त्यांना पळता भूई थोडी होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
करोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे.