मुंबई : देशातील सध्याच्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे सांगितले. या बैठकीला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. यावरुन राज्यातील भाजपा नेते टीका करत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत उत्तर दिले आहे. यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल असे त्यांनी सांगितले आहे.
“मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री होते. त्यांना कमी का लेखत आहात?,” अशी विचारणा यावेळी संजय राऊतांनी केली.
मात्र यावरुन भाजपा टीका करत आहेत यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.
तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर बोलताना, “या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किवं भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे” असेही त्यांनी म्हटले आहे.
“मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,” असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला.