राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून ते सत्तेत येईपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे ट्विटवॉर सर्वांनीच पाहिले आहे. आपल्या प्रत्येक ट्विटमधून ते भाजप सरकारला सूचक इशारा देत होते. दरम्यान,शिवसेना सत्तेत आली तरी संजय राऊतांचे ट्वीट वॉर सुरु आहे. आजही त्यांनी एक ट्वीट करुन विरोधकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या ट्वीटवर सत्ताधारी, विरोधक, राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 20, 2019
‘अंजाम से पहले खुद मेरी कहानी सुनाएगा कोई और !’ असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. त्यामुळे या ट्वीटचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. हे ट्विट म्हणजे विरोधकांसाठी इशारा आहे का ? की शिवसेनेची रणनीती आहे ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. शरद पवारांवर टीका करणाऱ्या सामनाचा उल्लेख त्यांनी अधिवेशनात केला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘सामना’चे मुख्य संपादक होते. त्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर पलटवार केला. आम्ही पंतप्रधान मोदींबद्दलही छापले होते हे तुम्ही दुर्लक्षित केले. स्वत:च्या सोयीनुसार सामना वाचत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर केली. आता ‘सामना’ची संपूर्ण जबाबदारी राऊतांकडे आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि ‘सामना’ यातून विरोधकांचे डावपेच हाणून पाडण्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळणार आहे.