बुलढाणा – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना वारंवार शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना दिसतात. सामनातील लेख आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे लावून धरण्यासाठी राऊत हे ओळखले जातात. संजय राऊत यांच्या याच सवयीवरून आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत हे जनतेची करमणूक करत असल्याचे वक्तव्य जाधव यांनी केले आहे.
संजय राऊत वारंवार हे सरकार लवकरच पडेल असं विधान करतात त्यावर आता राऊत तुम्ही जोशी केव्हापासून झालात ? असा सवाल प्रतापराव जाधव यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाधव यांनी ही टीका केली. तसेच संजय राऊत हे फक्त सध्या जनतेची करमणूक करत आहेत. असा टोला देखील यावेळी जाधव यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी संजय राऊत वारंवार माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे ठणकावून सांगत होते. त्यानंतर सरकार पडल्यानंतर देखील राऊत यांनी शिंदे भाजप सरकारवर आपला हल्लबोल सुरूच ठेवला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर राऊत शांत बसतील असं वाटत होत परंतु त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना अनेक कारणांवरून धारेवर धरायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.