मुंबई – मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे. कंगनाने केलेल्या मुंबईवरील टीकेवरून राजकारण प्रचंड तापलं असून, दररोज नवंनवी टीका सरकारवर केली जात आहेत. याच संदर्भात सामनाच्या ‘रोखठोख’ या सदरातून त्यांनी कंगना आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर या मुद्यावर निशाणा साधत मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!! ‘हा रोखठोख लेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा रोखठोख लेख ?
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबईविरोधात 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. भाजपचे एक प्रमुख नेते श्री. आशीष शेलार यांचे असे म्हणणे आहे की, ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत कशी?’ भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. श्री. मोरारजी देसाई त्या वेळी मुख्यमंत्री होते. गोळीबाराचे आदेश त्यांचेच होते. देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तशी गुजरातमध्येही 16 गुजराती बांधव शहीद झाले. आता इतिहास असे सांगतो की, हेच मोरारजी देसाई पुढे काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली. हेच देसाई पुढे देशाचे पंतप्रधान झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात श्री. अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील झालेच होते. खरे तर हा इतिहास आता खरवडून कशासाठी काढायचा? प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच. काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा तेव्हा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते.
चिखलफेक का?
कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा ‘मरगट्टा’ आज निप्रभ झाला काय? भारतीय जनता पक्ष त्यांच्या राष्ट्रीय धोरणानुसार भूमिका घेत आहे. अशीच राष्ट्रीय भूमिका पूर्वी काँग्रेस घेत असे हे विसरता येणार नाही. आज पुन्हा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत. पु. रा. बेहेरे यांनी एकदा म्हटले आहे, ‘मुंबईला निसर्गानेच महाराष्ट्राच्या बाहुपाशात ठेवले आहे. भूगोलानेच तिला महाराष्ट्राच्या अंगावर बसविले आहे.’ हा भूगोल बिघडवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे ‘जंतर मंतर’ प्रयोग सुरू झाले. ते आजही सुरूच आहेत.
मजूर का परतले?
मुंबईतून ‘लॉक डाऊन’ काळात लाखो मजूर आपापल्या राज्यांत परत गेले. त्यातले बहुसंख्य मजूर पुन्हा मुंबईत परत आले. मुंबई त्यांच्यासाठी रोजीरोटी देणारे शहर आहे. या शहराबाबत हा श्रमिक वर्ग कृतज्ञ आहे. मुंबई त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित शहर आहे. मुंबईच्या जडणघडणीत श्रमिकांचे योगदान मोठे आहे. मुंबई मूळची कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे प्रभू वगैरे समाजाची असेल. म्हणजेच मराठी माणसाची असेल; पण तिला धनकनक संपन्न आम्हीच केले, ही घमेंड, अहंकार मुंबईतील शेठ लोकांत तेव्हाही होता, आजदेखील आहेच. हीच घमेंड उतरवण्याचे काम सर्वांत आधी शिवसेनेने केले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दिल्लीच्या मनात कायम द्वेषभावना राहिली. जो शिवसेनेविरोधात बोलेल तो दिल्लीश्वरांची ‘लाडकी डार्लिंग’ होत असते. राजस्थानातील महाराणा प्रतापाचे वंशज व महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मर्हाठा’ वंशज यांच्या शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या बाबतीत कधीच शौर्य न गाजवलेल्या सध्याच्या राजकीय पिढीने नेहमीच आकस ठेवला हे आताही दिसत आहे.