मुंबई – सध्या ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठिंब्याबद्दल विरोधी पक्षांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रडायचं नाही लढायचं असा मंत्र दिला. त्यानुसार यापुढेही संघर्ष करत राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली. त्यानंतर विविध विरोधी पक्षांचे नेते त्यांचे समर्थन करण्यासाठी पुढे सरसावले. त्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आप, माकप, भाकप आणि इतर विरोधी पक्षांचे आभार राऊत यांनी पत्राद्वारे मानले. ते पत्र शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी जारी केले.
केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार माझ्यावर राजकीय सूडभावनेतून कारवाई करत आहे. पण, सत्यासाठीचा माझा लढा सुरूच राहील. दबावापुढे मी झुकणार नाही, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्याचे पडसाद संसदेत आणि संसदेबाहेरही उमटताना दिसत आहेत.