मुंबई – राज्यातील करोना काळात बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उद्यापासून पुन्हा खुली केली जाणार आहेत. तथापि मंदिरे उघडणे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा जय किंवा पराजय नाही.
सरकारही या निर्णयाचे श्रेय घेऊ इच्छित नाही अन्य कोणीही त्यासाठी प्रयत्न करू नयेत असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मंदिरे उघडण्याची घोषणा केली आहे.
सोमवारी दिवाळीच्या पाडव्यापासून ही मंदिरे खुली होत आहेत. त्यासाठी सरकारने एसओपी म्हणजेच स्टॅंन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर निश्चीत केली आहे. मंदिरे खुली होण्याचा निर्णय हा हिंदुत्वाचा विजय असल्याची प्रतिक्रीया भाजपने दिली आहे. तथापी हा कोणाचाही जय किंवा पराजय नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेवरूनच मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे नमूद करीत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान राऊत यांचा आज 60 वा वाढदिवस होता. त्यानिमीत्त राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की माझ्या आयुष्यातील निम्मा काळ मी पक्षाच्या मुखपत्रासाठी घालवला आहे. उर्वरीत काळातही शिवसेना मजबूत करण्याचेच काम आपण करणार आहोत असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.