मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयाशाबाबतही ते बोलले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामाना पेपर देखील वाचत नाही, असे नाना पटोलेंनी म्हटलं होतं. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खटके पडायला सुरूवात झाली आहे. नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युतर दिलं आहे.
आम्ही संजय राऊतांकडे लक्ष देत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले
काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे . सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय . बेरोजगारी , अर्थसंकट , महागाई , कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली . अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ ‘ च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे . पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही . तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल . काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा . सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा !
सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची गंभीर दखल घ्यावी लागेल आणि त्यातून योग्य तो धडा घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल, असे त्या म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे. ‘पक्षात आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील.’
श्रीमती गांधी या आजही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायलाच हवी. देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेसमधील ‘जी-23’ गटाने वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही.
सोनिया गांधी यांनी कार्य समितीच्या बैठकीत तोच मुद्दा उपस्थित केला. विधानसभा निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की, पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले. असं देखील संजय राऊत म्हणाले.