मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा अधिकाऱ्यांचा झापण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं हे प्रकार थांबले पाहिजे. असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ”महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं हे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकजण मनापासून एक मनामध्ये वेदना घेऊन बचाव कार्य करतो आहे. मग अधिकारी असतील प्रशासन असेल सरकार असतील, इतर पक्षाचे लोकं असतील तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कशाला करता.
महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपलं आहे, सातारा-सांगलीतील माणसं आपली आहेत. प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी. आपण काही लोकांचा बचाव करु शकतो. ही काही श्रेयाची लढाई नाही आहे. हा श्रेयवाद नाही आहे, ही राजकीय चढाई-लढाई नाही आहे. जर कोणाला असे वाटतं असेल तर ते माणूसकी शून्य काम आहे.”