मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने धडक कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबई, नागपूरमधील देशमुख यांच्या निवास्थानासह तब्बल पाच ठिकाणी छापेमारी करत काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहे. तसेच मध्यरात्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “अनिल देशमुखांच्या घरावर आणि कार्यालयावर ज्या छाडी पडल्या, त्याचे कारण भाजपची निराशा आहे. भाजपला सरकार बनवता आलेले नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच कारणास्तव महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही त्रास दिला जातोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे साऱ्यांना माहिती आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम केंद्रीय तपास यंत्रणांकरवी लपेटण्याचे काम सूरू आहे. आम्ही पण बघून घेऊ” राऊत माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.
“देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनण्याची तयारी सुरू आहे. पण ही आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय विरोधी पक्षांची आघाडी आकार घेऊ शकत नाही. शरद पवार यांचंही असंच म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनंही हेच म्हटलेलं आहे. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांनीही काल बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचाच संदर्भ दिला आहे. देशातील विरोधक एकत्र आले, अर्थात काँग्रेससह तरच देशात सध्याच्या राजकीय व्यवस्थेत चांगला पर्याय उभा राहू शकतो.” असे मत संजय राऊत यांनी आज मांडले आहे.
राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावरून वादविवाद सुरू आहेत. राज्यातील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया सुरु आहेत. दरम्यान ह्या कारवाया राजकीय सुडापोटी या यंत्रणांचा वापर करून करण्यात येत असल्याचे राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहे.