मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. ज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र हे सगळं एका दिवसात झालं नाही तर यामागे मोठं प्लॅनिंग आणि अचूक टायमिंग होत. हे सगळं कस घडलं याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात सांगितलं. मात्र बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी ते वेषांतर करून भेटत होते अशी खरमरीत टीका सामनातून करण्यात आली आहे.
फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. असा टोला सामनाच्या रोखठोखमधून लगावण्यात आला आहे.तसेच यावेळी बगदादच्या खलिफा हरुन-अल-रशीद यांचं उदाहरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आहे.
काय म्हटलंय नेमकं रोखठोकमध्ये
बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे. तो आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना ? प्रजेला काय समस्या आहेत ? आपले राज्य नीट चालले आहे ना ? हे सर्व जाणून घेण्यासाठी फिरत होता. पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी अशा कठोर शब्दात रोखठोकमधून शिंदे फडणवीसांवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार ? असा सवालही रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे.