मुंबई – मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे. आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे,,’ असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील पत्रव्यवहारातून संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली असून शिवसेना आणि राज्यपाल दोघांमधील संबध पुन्हा ताणताना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘राज्यपालांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना इंग्रजीमध्ये पत्र लिहिले आणि त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी परखड अशा मराठी ठाकरी भाषेत उत्तर दिले आहे आणि मुख्यमंत्र्यानं दिलेले उत्तर हा एक ऐतिहासिक दस्ताऐवज( हिस्ट्रोरिक डाॅक्यूमेंट) आहे. मुख्यमंत्र्याच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनात राज्यपालांना कोणताही आकावतांडव न करता अगदी सुस्पष्ट आणि विनम्र भाषेत कसं उत्तर द्यावं असा एक आदर्श असं उदाहरण, परिपाठ आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालिनतेनं, हिंदुत्वाच्या आणि घटनेच्या सर्व मर्यादा पाळून उत्तर दिलं आहे. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, त्याच्यावर फार चर्चा होऊ नये. राज्यपाल ही आदरणीय व्यक्त आहे त्यांचा अतिशय आम्हाला सन्मान आहे. असंही ते म्हणाले आहेत. ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा, असा सल्लाही राऊतांनी राज्यपालांना दिलाय.
बाकीच्या इतर गोष्टी लोकनियुक्त सरकार पाहत असते असा टोला देखील राऊतांनी लगावला. अनलॉक काढण्याबाबतचे निकष हे लोकनियुक्त सरकार ठरवेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील,असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील करोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरे पुन्हा उघडली जावीत अशी सुचना करणारे एक पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले. तथापि त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काही आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले. त्यानंतर या पत्रव्यवहारावरुन आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.आता शिवसेना नेत्यांनी देखील या पत्रावरुन राज्यपालांवर निशाणा साधला आहे.