मुंबई – ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून रोज मीडियासमोर येऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतात. राऊत हे अतिशय आक्रमकपणे आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात. “संजय राऊत यांचा भोंगा पहाटेच वाजतो ते आम्हाला घाबरतात म्हणून टीका करतात” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. आता यावर राऊत यांनी उत्तर देत थेट फडणवीसांना एक डील ऑफर केली आहे.
खरं तर अनेकदा संजय राऊत विखारी शब्दात सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवतात. यावरून अनेकदा त्यांच्यावर टीका देखील होते मात्र ते आपली बाजू माध्यमांसमोर स्पष्टपणे व्यक्त करत असल्यामुळे अनेकदा सत्ताधाऱ्यांना त्यांचा त्रासही होतो. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राऊत म्हणाले,”तुमच्या सागर बंगल्यासमोर मी नऊ वाजता पीसी घेईल तुम्ही साडे नऊ वाजता बोला. माझ्या पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे मी पक्षाची भूमिका मांडतो मग तुमच्या पोटात का दुखत ? याचा अर्थ ते आम्हाला घाबरतात” असं स्पष्ट मत राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आमची एवढी भीती वाटत असेल, आम्ही बोलू नये असं वाटत असेल तर बेकायदेशीर कृत्य थांबवा. कायद्याने राज्य करा, तुम्ही विरोधकांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू..तुम्ही तुमची कारस्थान थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू. सरळ डील आहे स्वीकारता का विचारा त्यांना ? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांची झालेली बैठक यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केलं. 2024 मध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे असंही राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना कारस्थान थांबवण्याचे आवाहन करत ही डील स्वीकारा असं म्हटल्यानंतर आता फडणवीस यावर नेमकं काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.