मुंबई – मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच, या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचं दिसून आलं होत. आणि आता हाच मुद्दा पकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. शक्तीमान नेते आहेत. तरीही ध र्मांतरे होत असतील. भाजप सांगतं तसं लव्ह जिहादची प्रकरणे होत असतील तर हे सरकारचं अपयश’ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, आता संजय राऊत यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी जोरदार उत्तर दिल आहे. ‘संजय राऊत हा एक रिकामटेकडा माणूस आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम नाही. मराठा समाजाच्या निघालेल्या लाखोंच्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून टिंगल केली होती.” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.
संजय गायकवाड म्हणाले, ‘सध्या राज्यात आणि देशांमध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, ते गोमातेच्या रक्षणासाठी आहेत. दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद जो हैदोस घालतो आहे. लाखो मुलींचे धर्मांतर त्या ठिकाणी करतो आहे. त्याच्या विरोधात हे मोर्चे निघत आहेत. संपूर्ण देशात हा कायदा करण्यात यावा, हा कायदा आपल्या हिताचा आहे. त्यामुळे या मोर्च्याची टिंगल टवाळी करणे थांबवा..’ असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
नेमकं संजय राऊत काय? म्हणाले…
राऊत म्हणाले, “मोर्चा हा कुणाविरोधात होता हे कळलंच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. मला वाटतं भाजप महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज आहे. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढला होता’. असं टोला त्यांनी लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले, “केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. शक्तीमान नेते आहेत. तरीही धर्मांतरे होत असतील. भाजप सांगतं तसं लव्ह जिहादची प्रकरणे होत असतील तर हे सरकारचं अपयश’ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.