मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊत यांनी ईडी कोठडीतून दैनिक सामनासाठी रोखठोक लिहीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलं होत त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली. हाच धागा पकडून राऊत यांनी रोखठोकमधून कोश्यारींना इतिहासाची आठवण करून दिली.
छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली असल्याची आठवण यावेळी राऊत यांनी करून दिली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
काय म्हटलंय नेमकं रोखठोकमध्ये
“महाराष्ट्रात व खासकरून मुंबईत गुजराती समाज पूर्वापार आहे, पण मुंबईवर हक्क आणि पगडा मराठी माणसाचाच राहील. मुंबईत मराठी माणसाचा ‘टक्का’ कमी झाला. मुंबईची आर्थिक सूत्रे मराठी माणसाकडे नसतीलही, पण ही मुंबई मराठी माणसानेच घडवली असे इतिहास सांगतो. मुंबईवर मराठय़ांचे राज्य कधीच नव्हते, असे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मुंबईवर मराठय़ांनी कधीच राज्य केले नाही, गुजरातने मात्र केलेले आहे असा संदर्भ आजही काही लोक देत असतात. तो खरा नाही असं राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.
सत्य व इतिहास असा आहे की, मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे मुसलमान सुलतान होते, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली सन 1534 सालात बहादूरशहा बेगदाने हा करार केला दुसऱयाचा माल तिसऱयाला देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची दलाली या बेगदाने घेतली. मराठी राज्यकर्त्यांनी फिरंग्यांबरोबरच्या लढाईत प्राण दिले. तेव्हाच मुंबई शत्रूंना घेता आली. मुंबईसाठी मराठी व मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे व कोश्यारी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी तो समजून घेतला पाहिजे. मुंबईत मराठी माणूस सतत श्रम करीत राहिला व संकटांशी लढत राहिला. बाकी सगळे आले ते फक्त लक्ष्मीदर्शनासाठी,” अशी भूमिका संजय राऊतांनी रोखठोखमध्ये मांडली आहे.