मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. त्यातच आज विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याअगोदर एक घटना घडली ज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित विधानभवनात दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर पुन्हा युतीच्या अनेक प्रकारच्या चर्चांना देखील उधाण आले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
फडणवीस आणि ठाकरेंनी असं एकत्र चालत जाण नवे राजकीय संकेत आहेत का ? असा सवाल संजय राऊत यांना मध्यमकर्मींनी विचारला असता ते म्हणाले,”मला असं वाटत नाही,मी एवढा भोळा आशावादी नाही. ज्या पद्धतीचे राजकारण आमच्यासोबत घडलंय त्या जखमा न भरून येण्यासारख्या आहेत.”
अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी वेगळी झाली. ठाकरे फडणवीस हे दोन्ही नेते एकत्र हसतमुखाने एकमेकांशी बोलत विधानभवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले होते.
येत्या शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आजही विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या पर्वात सर्वसामान्यांना काय फायदा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.